नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव द्या ! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

पनवेल : साहिल रेळेकर / राज भंडारी

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे पत्रकार परिषदेत केली. गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधी उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यानिमित्त सर्वपक्षीय नेते एकत्र येवून त्यांनी ही मागणी आज (शुक्रवार दि.१४ मे) रोजी पत्रकार परिषदेत घेतली. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. असे असताना अचानकपणे १७ एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटनांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. या बाबात त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, असे प्रतिपादन लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज येथे केले. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील विमानतळाला देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, त्या समितीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना दशरथ पाटील बोलत होते. या पत्रकार परिषदेला कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, कार्यकारणी सदस्य आमदार महेश बालदी, अतुल भगत, अतुल दि.पाटील, दशरथ भगत, जे. डी. तांडेल, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, के के म्हात्रे आदी उपस्थित होते.
२ जानेवारी २०१५ रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालिन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रीमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता त्यांनी तो तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १९ जून २०१८ रोजी पाठविला. फडणवीस साहेब यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे ७ जुलै २०१८ रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते. तसेच अनेक स्थानिक आगरी-कोळी आणि दहा गाव संघटनांच्या वतीने सिडकोकडेही मागणीही केली होती. पण ही लोकभावना लक्षात न घेता सिडकोने आता जी कती केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सिडकोविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले की, दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भुमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले आहे. १९८४ साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमिन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते, अशी माहिती दशरथ पाटील यांनी पत्रकारांना दिली.
आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौमत संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमाप्रश्न अशा अनेक जनलढ्यात त्यांनी हिरहिरीने भाग घेवून तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तीदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागृत राहावी यासाठी नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक संघटनांनी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल येथील जनतेच्या मनात नितांत आदर असून, त्यांचे वैक्तिमत्वही उत्तुंग आहे. त्यांचे नाव महाराष्ट्रातील इतर मोठ्या प्रकल्पांना देता येईल. मुंबईत त्यांचे शिवाजी पार्क येथे करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभे राहत आहे. त्याचे भूमिपुजन अलिकडेच मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आहे. पण नव्या मुंबईच्या निर्मितीसाठी व महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांचे जे योगदान आहे त्याला तोड नाही. म्हणून येथील विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी या पत्रकार परिषदेत विविध पक्षाच्या नेत्यांनी केली. या पत्रकार परिषदेला कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, सल्लागार  खा.कपिल पाटील, माजी खा.जगन्नाथ पाटील, कार्यकारणी सदस्य आमदार महेश बालदी, अतुल भगत, अतुल दि.पाटील, दशरथ भगत, जे. डी. तांडेल, मनोहर पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, के के म्हात्रे आदी उपस्थित होते.
Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *